पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यात निसर्ग व पर्यावरणाच्या संवर्धनाबद्दल चांगलीच जनजागृती झाली आहे. त्याची प्रचीती सध्या येत आहे ती पक्ष्यांना ठेवलेल्या पाण्याच्या भांड्यांवरून. नुकत्याच झालेल्या वसुंधरा दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठिकठिकाणी मारलेल्या फेरफटक्यावेळी ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली.
सध्याच्या कडक उन्हाळ्याचा विचार करून जिल्ह्यात ठिकठिकाणच्या नागरिकांनी पक्ष्यांसाठी पाण्याची भांडी ठेवलेली दिसून येत आहेत. कोणी मातीच्या भांड्यात, तर कोणी प्लास्टिकच्या भांड्यात पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था केल्याचे पाहायला मिळाले. वर्तमानपत्र, तसेच टीव्ही चॅनेलवरील बातम्या, तसेच सोशल मीडियावरील संदेशांमुळे पर्यावरणाबद्दलच्या जाणिवा थोड्या प्रगल्भ होऊ लागल्या आहेत. वाढत्या उन्हाचा विचार करून पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याचा विचार हा त्याचाच एक परिणाम असावा, असे म्हणण्यास जागा आहे.
रोपळे गावातील शेतकरी पोपट भोसले व त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य तर पक्ष्यांना पिण्यासाठी चक्क फिल्टरचे पाणी ठेवतात. हेही विशेषच म्हणावे लागेल. लोकवस्तीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाल्यामुळे स्थानिक पक्ष्यांचा त्या भागातील वावर वाढला आहे. पक्ष्यांसाठीच्या या पाणपोयांवर आता चिमणी, सनबर्ड, चष्मेवाला, बुलबुल, दयाळ, साळुंखी व टेलर बर्ड आदी पक्ष्यांची गर्दी वाढू लागली आहे. एकंदरीत चित्र सुखावणारे आहे.
‘हा उपक्रम केवळ एका दिवसासाठी नसून तो पावसाळ्यात चांगला पाऊस पडेपर्यंत चालू ठेवणार आहोत,’ असे बाभूळगाव (ता. पंढरपूर) येथील राज्य पुरस्कारप्राप्त निवृत्त मुख्याध्यापक राजाराम वाघमारे यांनी सांगितले. सर्वच ठिकाणच्या नागरिकांनी आपापल्या भागांमध्ये पक्ष्यांसाठी पाण्याची शक्य तितकी व्यवस्था करावी, असे आवाहनही या पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केले आहे.